अनेक वर्षे किडनी निकामी होण्याशी झुंज दिल्यानंतर रुग्णाला तिसऱ्या प्रत्यारोपणाद्वारे नवसंजीवनी; वैद्यकीय कौशल्य आणि कुटुंबाच्या पाठिंब्याचे प्रभावी उदाहरण पुणे ,.अत्यंत दुर्मिळ आणि गुंतागुंतीच्या वैद्यकीय प्रक्रियेत, पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ८ सप्टेंबर २०२५ रोजी एका रुग्णावर तिसरे किडनी प्रत्यारोपण यशस्वीपणे केले होते. अनेक वर्षे किडनीच्या आजाराशी झुंज देणाऱ्या या रुग्णाला या शस्त्रक्रियेमुळे आयुष्याची नवी संधी मिळाली. विशेष बाब म्हणजे दुसरे प्रत्यारोपण अयशस्वी झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने पुढे येत स्वतःची किडनी दान केली. तिसरे किडनी प्रत्यारोपण अत्यंत दुर्मिळ मानले जाते आणि रुग्ण तसेच डॉक्टरांसाठीही हे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान असते. आधीच्या शस्त्रक्रियांमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात जखमांचे ऊतक (scar tissue) तयार होते, त्यामुळे नवीन किडनी बसवण्यासाठी योग्य जागा आणि रक्तवाहिन्या शोधणे कठीण होते. याशिवाय अनेक वेळा प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमध्ये शरीराची प्रतिकारशक्ती अधिक संवेदनशील (immune sensitisation) होते, ज्यामुळे नवीन अवयव नाकारला जाण्याचा धोका वाढतो. श्री. प्रसाद (नाव बदलेले आहे) यांचा वैद्यकीय प्रवास २०१८ मध्ये सुरू झाला, जेव्हा त्यांना क्रॉनिक किडनी डिसीज (Chronic Kidney Disease) असल्याचे निदान झाले. त्याच वर्षी त्यांच्या आईने किडनी दान केल्यानंतर त्यांचे पहिले किडनी प्रत्यारोपण ते राहत असलेल्या शहरात करण्यात आले. मात्र २०२२ पर्यंत ती किडनी निकामी होऊ लागल्याने त्यांच्या बहिणीने किडनी दान करून दुसरे प्रत्यारोपण करण्यात आले. २०२५ मध्ये दुर्दैवाने दुसरी किडनी ‘बीके व्हायरस’मुळे झालेल्या गुंतागुंतीमुळे निकामी झाली. हा दुर्मिळ संसर्ग प्रत्यारोपित किडनीला नुकसान पोहोचवू शकतो. किडनीचे कार्य हळूहळू कमी होत गेल्याने त्यांना पुन्हा डायलिसिस सुरू करावा लागला. दुसऱ्यांदा प्रत्यारोपण केलेली किडनी जेव्हा निकामी झाली तेव्हा नव्या आयुष्याच्या आशेने श्री. प्रसाद यांनी पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलशी संपर्क साधला. डॉक्टरांनी त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले—आयुष्यभर डायलिसिस सुरू ठेवणे किंवा सर्व गुंतागुंती असूनही तिसरे प्रत्यारोपण करण्याचा प्रयत्न करणे. आयुष्यासाठी लढण्याचा निर्धार करत त्यांनी प्रत्यारोपणाचा पर्याय निवडला आणि यावेळी त्यांच्या पत्नीने किडनी दान करण्यासाठी पुढाकार घेतला. ही शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे येथील मल्टी-ऑर्गन ट्रान्सप्लांट विभागाचे वरिष्ठ सर्जन डॉ. सूर्यभान भालेराव यांनी केली. या प्रक्रियेसाठी अत्यंत अचूक शस्त्रक्रियात्मक कौशल्याची आवश्यकता होती. दीर्घ आणि गुंतागुंतीच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाची स्थिती काळजीपूर्वक सांभाळण्यात डॉ. भाग्यश्री अर्भी आणि डॉ. नेहा काळसेकर यांच्या नेतृत्वाखालील अॅनेस्थेसिया टीमने महत्त्वाची भूमिका बजावली. डॉ. भालेराव म्हणाले, “तिसरे किडनी प्रत्यारोपण हे नियमित शस्त्रक्रियांपेक्षा खूपच गुंतागुंतीचे असते. आधीच्या शस्त्रक्रियांमुळे शरीररचनेत बदल आणि जखमांचे ऊतक तयार झालेले असते, त्यामुळे ऑपरेशन तांत्रिकदृष्ट्या अधिक अवघड होते. सामान्यतः किडनी प्रत्यारोपणासाठी तीन ते चार तास लागतात, मात्र ही शस्त्रक्रिया सुमारे सहा ते साडेसहा तास चालली. सर्व आव्हानांवर मात करत आम्ही किडनी यशस्वीरित्या प्रत्यारोपित केली आणि शस्त्रक्रियेनंतर लगेचच ती कार्यरत झाली.” शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे होते. कन्सल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट डॉ. स्वाती माने यांच्या मते, अनेक वेळा प्रत्यारोपण झालेल्या रुग्णांमध्ये अवयव नाकारला जाण्याचा आणि संसर्गाचा धोका अधिक असतो. त्या म्हणाल्या, “श्री. प्रसाद यांच्या शरीरात प्रतिकारशक्तीची संवेदनशीलता वाढलेली होती आणि बीके व्हायरसशी संबंधित नेफ्रोपॅथीचा इतिहासही होता, ज्यामुळे आधीची किडनी निकामी झाली होती. त्यामुळे अवयव नाकारला जाण्यापासून संरक्षण मिळावे आणि त्याच वेळी शरीराला संसर्गाशी लढता यावे यासाठी आम्ही इम्युनोसप्रेसिव्ह उपचारांचे संतुलन अत्यंत काळजीपूर्वक राखले. या नाजूक संतुलनामुळेच प्रत्यारोपण यशस्वी झाले.” सध्या श्री. प्रसाद यांची प्रकृती चांगली असून प्रत्यारोपित किडनी व्यवस्थित कार्यरत आहे. डॉक्टरांच्या मते, ही कहाणी वैद्यकीय कौशल्य, रुग्णाचा दृढ निश्चय आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यांच्या एकत्रित शक्तीचे प्रभावी उदाहरण आहे. डॉ. माने पुढे म्हणाल्या, “तीन किडनी प्रत्यारोपणांनंतरही जगणे हे अत्यंत धैर्य आणि चिकाटीची गोष्ट आहे. श्री. प्रसाद यांचे धाडस आणि त्यांच्या कुटुंबाचा, विशेषतः त्यांच्या पत्नीने दिलेल्या जीवनदायी दानाचा पाठिंबा, यामुळेच हे उल्लेखनीय यश शक्य झाले.”