पुणे : विनायक दामोदर सावरकर यांचे विचार विविध माध्यमांतून सर्वसामान्य लोकांपर्यंत आणि विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी देवव्रत बापट यांनी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनामुळे हिंदुत्ववादी विचार जपणारा सच्चा सावरकर भक्त हरपल्याची भावना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते देवव्रत बापट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, श्री देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश भागवत, सात्यकी सावरकर, रणजीत नातु, आबासाहेब कांबळे, निरंजन फडके, विद्याधर नारगोळकर आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करून बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सूर्यकांत पाठक म्हणाले, देवव्रत बापट आणि मी एकत्र कॉलेजमध्ये किंवा शाळेत नव्हतो. आमचे वयही एकसारखे नव्हते. तरीही सामाजिक कार्याच्या माध्यमातून आमचा परिचय झाला आणि तो कायम टिकला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार घराघरात पोहोचवण्याचे त्यांनी एक प्रकारे व्रत घेतले होते आणि ते व्रत त्यांनी पूर्ण केले. सावरकरांवरील चित्रपटाचे अभिनेता रणदीप हुडा यांना पुण्यात आमंत्रित करून विशेषतः नव्या पिढीपर्यंत सावरकरांचे विचार त्यांनी पोहोचविले.
रमेश भागवत म्हणाले, देवव्रत बापट यांच्या निधनामुळे हिंदुत्ववादी विचार जपणारा कार्यकर्ता हरपला. त्यांच्या जाण्याने केवळ सामाजिक नुकसान झाले नाही, तर प्रत्येकाचे वैयक्तिक व कौटुंबिक नुकसान झाले आहे. सावरकरवादी विचार जपण्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची देवव्रत बापट यांची तयारी असायची.
सात्यकी सावरकर म्हणाले, देवव्रत बापट यांच्यासारखे संघटन कौशल्य असणारे व्यक्तिमत्त्व समाजाची गरज आहे. ‘हर घर सावरकर’ समितीच्या माध्यमातून त्यांनी सावरकरांचे विचार घराघरात पोहोचविले. सावरकरांच्या जीवनावरील चित्रपटाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते.
विद्याधर नारगोळकर म्हणाले, देवव्रत बापट यांनी हिंदुत्ववादी विचार पोहोचवण्यासाठी आणि सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी आयुष्य वाहिले. त्यांच्या कामाचा झपाटा मोठा होता. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सावरकरांनी रचलेले शिवाजी महाराजांवरील गीत प्रथम देवव्रत बापट यांनी सादर केले होते.
आबासाहेब कांबळे म्हणाले, देवव्रत बापट यांनी बाजीराव पेशवा शाळेच्या उभारणीसाठी आणि त्या शाळेच्या विकासासाठी आयुष्यभर काम केले. या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराला देवव्रत बापट यांचे नाव देण्याचा आमचा मानस आहे.
